Mumbai-Goa Highway Tendernama
कोकण

Mumbai-Goa Highway दुरावस्थेबद्दल बोंबाबोंब आंदोलन; तब्बल 10 हजार SMS पाठवले

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गाच्‍या (Mumbai-Goa Highway) दुरवस्‍थेकडे प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी रायगड प्रेस क्‍लबच्‍यावतीने महामार्गावर वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलन करण्‍यात आले. आंदोलनावेळी महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल लोकप्रतिनिधींना जाब विचारणारे १० हजार एसएमएस पाठविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे यांना हे एसएमएस पाठविण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2011 मध्ये सुरू झाले. 12 वर्षे होऊन गेले तरी काम पूर्ण झालेले नाही. सरकारने वेळोवेळी अनेक वादे केले पण काम पूर्ण झाले नाही. चौपदरीकरण तर होत नाहीच उलट रायगड जिल्ह्यात या रस्त्याची चाळण झाली असल्याने हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे. मात्र सत्ताधारी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या खड्ड्याबाबत आणि महामार्गाबाबत कमालीचे मौन बाळगून आहेत. त्यामुळे कोकणातील मंत्री, खासदार आमदार यांना बोलते करण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींची निष्क्रियता जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी पुन्हा एकदा रायगडमधील पत्रकार रस्त्यावर उतरले.

मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरावेत आणि 12 वर्षांपासून रखडलेले महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे या मागणीसाठी पत्रकारांनी वाकण नाक्यावर आंदोलन केले. या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा ही विनंती, अशी विनंती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांनी केली. रायगडमधील पत्रकारांच्या बोंबाबोंब आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ आपल्या तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन आपला संताप व्यक्त केला, अशी माहिती पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांनी दिली.

दरम्यान, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा रखडलेला विकास पूर्ण होण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील पत्रकार यांनी बोंबाबोंब आंदोलन केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेवून हा महामार्ग एका वर्षात पूर्ण करण्याबाबत शपथ घेतली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णतेसाठी सातत्याने वेगवेगळ्या संस्थाकडून आंदोलन व मागण्या होत आहेत. तसेच कोकणातील पत्रकार यांनी बोंबाबोंब आंदोलन करून निषेधाचे दहा हजार संदेश पाठविण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी संघटना पत्रकार व नागरिकांना महामार्गाच्या विकासासाठी स्वतः कटिबद्ध असल्याचे आश्वस्त करताना आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले आहे.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गबाबत आंदोलनकर्त्या आपल्या सर्वांच्या भावना व कोकणवासीयांच्या भावना याच माझ्या देखील भावना आहेत. आपला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हा तीन जिल्ह्यात विभागाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा महामार्ग पूर्ण मी पालकमंत्री असताना झाला आणि तसाच माझा प्रयत्न माझा रायगड आणि रत्नागिरीसाठी आहे. काही ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणी मध्ये मार्ग अडकला आहे मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेतल्या आहेत तरीही अपयश येते, ह्याची मला कल्पना आहे. पण मी आपणास शब्द देतो पुढच्या वर्षात काहीही करून हा रस्ता पूर्ण करू ह्याची मी खात्री देतो. तुमच्या भावनांचा आदर करून मी शपथ घेतो की पुढच्या एका वर्षात हा हायवे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी कळविले आहे.