Indian Railway Tendernama
कोकण

रायगड जिल्ह्यात 'त्या' 3 नव्या रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यातील खारपाडा, गडब, आमटेम येथे नवे स्टेशन बांधण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे. रेल्वेमंत्र्यांना भेटून हा प्रस्ताव मार्गी लावू, असे आश्वासन खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात रेल्वे संदर्भात समस्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. ही बैठक मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मुख्य कार्यालयात पार पडली. खारपाडा रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव यापूर्वीच दिल्लीला मंजुरीसाठी पाठवला होता. परंतु, जिते स्टेशन आणि खारपाडापर्यंतचे अंतर कमी होत असल्याने तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. मात्र खारपाडा येथे होणारे रेल्वे स्टेशन दुष्मी हद्दीमध्ये करण्यात यावे, अशा सूचना खासदार तटकरे यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापकांना केली आहे. त्यामुळे आता खारपाडा स्टेशनसह गडब, आमटेम या तीन स्टेशन्सचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून सादर केला जाणार आहे.

या बैठकीत पेणवासियांना रेल्वे संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पनवेल-वसई-पनवेल आणि पनवेल-डहाणू-पनवेल या दोन्ही मेमू ट्रेन पेणपर्यंत वाढवाव्यात आणि दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५ व १०१०६) या गाडीला पुन्हा पेण स्टेशनात थांबा मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या. कोविडकाळात या गाडीचा पेण थांबा बंद केला होता, याचीही आठवण यावेळी करून देण्यात आली. याशिवाय मांडवी एक्स्प्रेस (१०१०३ व १०१०४), नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५ व १६३४६), मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२६१९ व १२६२०), कोकणकन्या एक्स्प्रेस (१०१११ व १०११२) या गाड्या पेण स्टेशनात थांबवाव्यात. दिवा-रत्नागिरी-दिवा गाडीला हमरापूर स्टेशनमध्ये थांबा मिळावा आणि प्लॅटफॉर्मवरील फूट ओव्हर ब्रिज हा प्लॅटफॉर्मच्या एका बाजूला झालेला आहे. तरी हा फूट ओव्हर ब्रिज प्लॅटफॉर्मच्या मध्यावर बांधण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. बैठकीला 'माझं पेण' संघटनेकडून अध्यक्ष राजेंद्र पाटील, गणेश लक्ष्मण तांडेल, दिलीप मुकुंद पाटील आणि पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य परशुराम मोकल, सचिन तांबोळी हिरामण गायकर, रवींद्र म्हात्रे, विश्वनाथ बेकावडे, दिलीप पाटील, राजश्री पाटील, गणेश गायकर आदी उपस्थित होते.