Tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : लासलगावातील बाह्यवळण रस्ता, उड्डाणपुलाचे काम 17 वर्षांपासून का रखडले?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मध्य रेल्वे मार्गावर निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील रेल्वे उड्डाणपूल (Railway Bridge) दोन वर्षांपुर्वी मंजूर होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, लासलगाव (Lasalgaon) या मोठ्या बाजारपेठेत याच रेल्वेमार्गावर उभारण्यात येणारा उड्डाणपूल चार वर्षांपुर्वी बांधून पूर्ण होऊनही विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील बाह्य वळण रस्त्याचेही काम रखडल्याने तो वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. आता मनमाडला रेल्वेपूल कोसळल्यानंतर तेथील वाहतूक लासलगावमार्गे वळवण्यात आल्यामुळे उड्डाणपुलाअभावी आधीच असलेल्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.

लासलगाव येथे कांद्याची देशातील सर्वांत मोठी बाजारसमिती आहे. तसेच लासलगाव निफाड व येवला तालुक्यातील ४० ते ५० गावांची बाजारपेठ आहे. याशिवाय बाजार समिती, भाभा अणू संशोधन केंद्र, वखार महामंडळाचे गुदाम, राष्ट्रीय बागवानी संघ, वेफको, नाफेडचे कार्यालय यामुळे तालुकाभरातून निफाडला कामानिमित्त नियमितपणे मोठ्या संख्येने लोक येत असतात. मात्र, रेल्वे उड्डाणपुलाअभावी रेल्वेमार्ग ओलांडताना मोठी वाहतूक कोंडी होत असते.

यावर पर्याय म्हणून रेल्वे उड्डाणपूल व त्याला जोडण्यासाठी विंचर-प्रकाशा राज्यमार्गाचा बाह्यवळण रस्ता यांची कामे २००५ मध्ये मंजूर करण्यात आली. मात्र, १७ वर्षांत ना उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला ना बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण झाले. उड्डाणपुलाचे काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे, तर बाह्य वळण रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

('टेंडरनामा'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किरकोळ काम उरले असले, तरी रस्ता खुला नसल्याने लासलगावकरांना नित्यानेच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता मनमाडचा पूल कोसळल्याने मनमाडची रहदारी लासलगावकडे वळवल्याने लासलगाव रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

मतदारसंघास दोन मंत्री लाभले असतानाही लासलगावकरांना उड्डाणपूल व बाह्य वळण रस्त्यासाठी १७ वर्षे वाट बघावी लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत असतात. प्रत्येकवेळी अधिवेशनात निधीची उपलब्धता करून काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले जाते. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अर्थ समितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठवल्याचे कारण सांगितले जाते. मात्र, कामाच्या बाबतीही काहीही प्रगती होत नाही.

दरम्यान आमदार दिलीप बनकर यांच्या मतदारसंघांतील खेरवाडीचा उड्डाणपूल फक्त २२ महिन्यांत पूर्णत्वास येऊन वाहतुकीसाठी खुलाही झाला आहे. लासलगाव बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन करून जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणारा दर त्यांना मान्य नसल्याने काम रखडल्याचे सांगितले जाते.

या एकाच रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या लासलगाव, विंचूर, टाकळी येथील दरात फरक असल्याने शेतकरी जमिनी देण्यास तयार नसल्याने बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले आहे. मात्र, त्यातून तोडगा काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने हा प्रश्न सतरा-अठरा वर्षांपासून रखडला आहे.