Chandrapur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : चंद्रपुरातील वरोरा नाका चौक धोकादायक; दुभाजकावर रोज अपघात

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर येथील अत्यंत वर्दळ असलेल्या वरोरा नाका चौकाची पूर्वी अपघातग्रस्त चौक अशी ओळख होती. ही ओळख पुसण्यासाठी येथे नव्याने उड्डाणपुलाला जोड पूल बांधण्यात आला. यामुळे अपघाताची संख्या काही प्रमाणात घटली. मात्र या चौकापूर्वी नागपूर-चंद्रपूर रोडवर मधोमध बांधण्यात आलेला डिव्हायडर अपघातास कारणीभूत ठरत आहे.

प्रत्येक दिवशी या डिव्हायडरवर वाहने धडकत क्षतिग्रस्त होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. विशेष म्हणजे, या डिव्हायडरवर प्रशासन दिवसाआड मलमपट्टी करून वेळ काढत आहे. मात्र ही मलमपट्टी किती दिवस चालणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल वरोरा नाका चौकामध्ये रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र या पुलामुळे अनेक अपघात झाले. अपघातप्रणव स्थळ अशी वरोरा नाका चौकची ओळख झाली होती. यावर उपाययोजना म्हणून जुन्या उड्डाणपुलाला दुसरा जोड पूल बांधण्यात आला. यानंतर येथील अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. आता या चौकामध्ये सिग्नल लावण्यात आले आहे. सध्या सिग्नल सुरू व्हायचे आहे. मात्र या पुलावर ट्रक किंवा इतर जड वाहने चढविताना चालकांची मोठी दमछाक होत आहे. जड वाहन चालक काही अंतरावरूनच वाहनांना रेस करीत चढवतात. सिग्नल सुरू झाल्यास वाहनांना पुलावर चडविण्यासाठी लागणारी गती मिळणार नसल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. सिग्नल सुरू करण्यापूर्वी या वाहनांचाही विचार करावा, त्यावरही उपाययोजना कराव्या, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. त्यापूर्वी डिव्हायडरचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणेही तितकेच महत्वाचे आहे.

प्रशासनही आता थकले : 

या डिव्हायडरवर आजपर्यंत शेकड़ो अपघात झाले आहे. अपघात झाल्यानंतर काही उपाययोजना केल्या जात आहे. रेडियम पट्या लावून, पांढरे पट्टे मारूनही उपयोग होत नसल्याचे सध्या तरी अपघातावरून दिसून येत आहे. वरोरा नाका चौकापूर्वी नागपूर-चंद्रपूर रोडवर असलेले डिव्हायडर अत्यंत धोकादायक ठरत आहे. आजपर्यंत यामुळे अनेक अपघात झाले आहे. चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या मधोमध असलेले हे डिव्हायडर काढून येथे कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. अशी प्रतिक्रिया दीपक साळवे, चंद्रपूर च्या नागरिकने दिली.

रामनगरमध्येही स्थिती बिकट :

संत कवरराम चौक ते आंबेडकर कॉलेजकडे येणाऱ्या रस्त्यावरही रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बांधण्यात आला आहे. मात्र या डिव्हायडरवरही वाहने चढत असून अपघात होत आहे. विशेष म्हणजे, येथे दोन्ही बाजूने सुरक्षेच्या कोणत्याही उपाय- योजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे अपघात होत आहे.